मा.वैभव नागनाथ नायकवडी
spacer
 
मुख्य पान » परिचय


Vaibhav Nagnath Nayakawadi
मा.वैभव नागनाथ नायकवडी

मा.वैभव नागनाथ नायकवडी यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1967 रोजी स्वातंत्र्य संग्रामाची एैतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाळवे,ता.वाळवा,जि.सांगली येथे झाला. त्यांचे वडील पदमभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हे स्वातंत्र्य संग्रामातील थोर क्रांतीकारक, प्रती सरकारचे सेनानी, शिक्षण आणि उद्योग यांचे माध्यमातून रचनात्मक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. आई कुसूमताई आदर्श माता पुरस्काराने सन्मानीत आहेत. .

शिक्षण : :

त्यांचे प्राथमिक शिक्षण वाळवे येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हुतात्मा किसन अहिर विघालय वाळवे येथे झाले. त्यांनी महाविघालयीन शिक्षण न्यू कॉलेज कोल्हापूर येथून पुर्ण केले. शिवाजी विघापीठ कोल्हापूर मधून त्यांनी एम.ए. राज्यशास्त्र पदव्यूत्तर शिक्षण घेतले.

सार्वजनिक जीवन :

1990 पासून वाळवा येथे हुतात्मा चळवळीचे कार्यकर्ते म्हणून सार्वजनिक जीवनात कामास सुरूवात केली. लहानपणापासूनच त्यांना खो-खो खेळाची विशेष आवड त्यामुळे माध्यमिक शाळेत स्तरावर खो-खो संघात निवड, त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. शिवाजी विघापीठातही खो-खो संघाचे नेतृत्व करून अखिल भारतीय पातळीवर विजय मिळवला. 1988-89 साली शिवाजी विघापीठात स्टुडंड कौन्सीलची निवडणूक लढवून चेअरमन पदावर विराजमान झाले.

सार्वजनिक जीवनात रचनात्मक व विधायक कार्य करताना 22 सहकारी पाणी पुरवठा संस्था निर्माण करून 5322 एकर जमीन ओलीताखाली आणली. हुतात्मा कारखान्याच्या वतीने नागनाथअण्णांच्या नेतृत्वाखाली झोन दुरूस्ती चळवळीत आंदोलन करताना अटक होऊन इस्लामपूर व शिराळा येथे तुरूंगवास भोगला. वारणा व कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या स्थापनेत सक्रीय सहभाग घेतला. स्वत:चे नेतृत्वखाली अनेक आंदोलने यशस्वी करून धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वाळवा येथे 5 सप्टेंबर 1991 ला हुतात्मा किसन अहिर सहकारी नागरी पतसंस्थेची स्थापना केली. वाळवा परिसरात महाविघालयीन शिक्षणाची सोय व्हावी म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे शैक्षणिक स्मारक ''क्रांतिसिंह नाना पाटील महाविघालय'' 20 जून 1992 रोजी वाळवा येथे सुरू केले.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना संघटीत करून क्रांतिसिंह नाना पाटील बागायतदार ग्रेपग्रोअर संस्थेची स्थापना करून कोल्डस्टोअरेज उभा केले. बाबरी मशिदीच्या पाडावा नंतर देशात सामाजिक एकात्मता व सलोखा निर्माण करण्यासाठी वाळवा ते चांदोली धरण 80 कि.मी. मानवी साखळी करण्यात सक्रीय सहभाग घेतला.

1993 साली शेतीच्या अभ्यासासाठी ईस्रायलला भेट दिली. तेथील उच्च तंत्रज्ञानाची माहिती वाळवा परिसरातील शेतकऱ्यांना कार्यशाळा घेऊन देण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील कायम दुष्काळी असणाऱ्या सांगली,सातारा,सोलापूर जिल्हयातील 13 दुष्काळी तालुक्यातील पाणी परिषदेत सक्रीय सहभाग. सन 2012 पासून 13 दुष्काळी तालुक्यातील पाणी परिषदेचे नेतृत्व करून पाणी परिषद भरवून पाणी योजना पुर्ण करण्यासाठी संघर्ष चालू ठेवला आहे.

1994 पासून हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजामध्ये पूर्ण वेळ निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग. 15 ऑगस्ट 1996 रोजी हुतात्मा सहकारी बँकेची स्थापना केली. आज या बँकेच्या 16 संगणकीकृत शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत. आज या बँकेची 500 कोटी रूपयाची वार्षिक उलाढाल आहे

1996 मध्ये सांगली जिल्हा परिषदेवर निवड. कृषी व बांधकाम समिती सदस्य म्हणून काम केले. 1997 मध्ये शेतीला जोड धंदा असणाऱ्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हुतात्मा दूध संघाची उभारणी केली. 1999 पासून प्रतिवर्षी किसान शिक्षण संस्थे अंतर्गत सर्व संस्थातील सेवकांचे प्रबोधन व चिंतन शिबीर आयोजित केले जाते. 2000 मध्ये बदलत्या शैक्षणिक गरजांचा विचार करून हुतात्मा इन्स्टिटयुट ऑफ इन्फरमेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी संस्थेची स्थापना केली. 2008 मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या उदघाटन समारंभाकरिता राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्याचे यशस्वी आयोजन केले.

गेली 15 वर्षे पदमभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून यशस्वीपणे धूरा सांभाळत आहेत. त्यांचा मानवतावादी दष्टीकोन, नि:स्वार्थीपणा, अखंड परिश्रम, अचुक दुरदष्टी सामान्य जनतेविषयी असलेली कनव या गुणविशेषामुळे आणि ऊस उत्पादन, साखर उत्पादन, साखर उतारा या बाबतीत सतत नवनवीन प्रयोग यशस्वीपणे राबवण्याच्या वृत्तीमुळे अत्युच्य साखर उतारा, उच्चांकी ऊस दर मिळवून साखर उद्योग क्षेत्रात आदर्श हुतात्मा पॅटर्न' निर्माण केला आहे. ऊस उत्पादकांना विक्रमी ऊसदर देऊन ऊस उत्पादकामध्ये ऊस दरा बाबत जागृती निर्माण करून साखर कारखानदारी मध्ये ऊस दराची स्पर्धा केली आहे.

वाळवा येथे महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या हुतात्मा सहकारी ग्राहक भांडाराची स्थापना करून आज त्याच्या 7 शाखा द्वारे 48 कोटी रूपयाची वार्षिक उलाढाल होते. हुतात्मा संकुलाच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातील विविध संस्थांना राज्य व राष्ट्रीयस्तरावरील पुरस्काराने गौरविले आहे. नुकतीच त्यांची रयत शिक्षण संस्था जनरल बॉडीच्या सदस्य पदी निवड झाली आहे. गेली 25 वर्षापेक्षा जास्त सार्वजनिक जीवनात तत्वाने, निष्कलंक, अभ्यासू व कुशल सामाजिक भान असणारे सहकार क्षेत्रातील जानते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

ते ख़ालील महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत :

  • चेअरमन, पदमभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि.नागनाथअण्णानगर, वाळवे, ता.वाळवा जि.सांगली
  • संस्थापक, हुतात्मा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या.,वाळवा,ता.वाळवा, जि.सांगली
  • संस्थापक, हुतात्मा सहकारी बँक लि.,वाळवा,ता.वाळवा,जि.सांगली
  • अध्यक्ष, किसान शिक्षण संस्था,वाळवा, ता.वाळवा,जि.सांगली
  • सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था,सातारा
  • सदस्य, राज्यशास्त्र विभाग अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

 

पदमभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि.नागनाथअण्णानगर, वाळवे